कोल्हापूर (प्रतिनिधी) : तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. माध्यमांनी त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत प्रा. साधना झाडबुके यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित ‘तृतीयपंथीय आणि माध्यमे’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.

तृतीयपंथीयांची समाजाकडून होणारी अवहेलना, विविध पद्धतीने हिनवणे, चेष्टा करणे, विनयभंग करणे तसेच त्यांना मिळणारी वागणूक, त्यांच्या समस्या याविषयी सामाजिक कार्यकर्त्या संशोधक प्रा. साधना झाडबुके त्यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी केंद्र सरकारच्या तृतीयपंथीयांसाठीचा २०१९ च्या कायद्याची माहिती दिली. माध्यमांनी या कायद्यातील तरतुदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तृतीयपंथीयांना सार्वजनिक सुविधांपासून वंचित करता येणार नाही तसेच या सुविधा नाकारता येणार नाही. असे घडल्यास तो कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली. तृतीयपंथीयांना स्त्री-पुरुषांसारखे शासकीय योजनेचे लाभ मिळावेत, अशी अपेक्षा झाडबुके यांनी व्यक्त केली.

कादंबरी भोसले, सिमरन घाशी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. विभागप्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देऊन प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. सुमेधा साळुंखे, सचिन दिवाण, अनुराधा इनामदार आणि विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.