रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी (ता.हातकणंगले) येथे सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जहॉंगिर मुल्लाणी यांचे राहते घर जमीनदोस्त झाले.त्यामध्ये प्रापंचिक साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. राहते घरच पडल्याने कुटुंबावर भाडोत्री घराचा आधार घेण्याची वेळ आली आहे. रात्रीच्या सुमारास घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या संतोष कमते यांच्या घराच्या भिंतीची कांही अंशी पडझड झाली आहे.

नादिवेस भागात राहणाऱ्या मुल्लाणी यांचे जुने दगड मातीचे घर आहे. दोन दिवसांपासून जोरदार पावसाने घराची थोडी-थोडी पडझड सुरू होती. शुक्रवारी सकाळी प्रापंचिक साहित्य हलवण्यापूर्वीच घर ढासळले.यामध्ये प्रापंचिक साहित्य कांहीच हाताला लागले नाही. ही घटना रात्रीच्या सुमारास झाली असती तर मोठा अनर्थ झाला असता. दिवसा घटना घडल्याने मोठी जीवित हानी टळली. मुल्लाणी यांनी वारंवार घरकुल मंजुरीसाठी पाठपुरावा केला आहे. पण, अद्यापही त्याचा लाभ मिळाला नाही. शेजारी राहणाऱ्या कमते यांच्या घराचीही पडझड झाली आहे. घटनास्थळी ग्रामविकासाधिकारी कुमार वंजिरे व तलाठी एस. ए. गवंडी यानी पाहणी केली.