मुंबई (प्रतिनिधी) :  मनसे  नेते संदीप देशपांडे  यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येवर शंका घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सावधान, सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असे आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, असे म्हणत  जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका,  असा इशारा  देशपांडे  यांनी दिला आहे.   

विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे नसेल तर नका घेऊ, अध्यक्षांची निवड करायची नसेल तर नका करू. पण लोकांना भीती कशाला घालताय,  तिकडे शेतकऱ्यांचे मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र तिकडे कोरोना नाही.  अधिवेशनाच्याच काळात कोरोनाचा फैलाव कसा होतो ?   राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना कोरोना कसा काय होतोय, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

अमरावतीत कोरोनाच्या जास्त टेस्ट घ्यायच्या आणि कोरोना वाढल्याचे सांगायचे. गेल्या चार महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पेट्रोल दरवाढीवर आंदोलन झालं तेव्हा कोरोना पसरला नाही. बसमध्ये चेंगरून लोक प्रवास करताहेत, तेव्हा कोरोना कसा काय नाही झाला. अधिवेशनाच्याच काळात कोरोनाचा फैलाव कसा होतो आहे, अशी शंका देशपांडे यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे.