मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही,  असे शिवसेनेने म्हटले आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, नांदेड, नगर या शहरांनी कोरोनात आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात ५४ रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळं विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर सरकारला कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सरकारनं कडक पावलं उचलली तर विरोधी पक्ष तांडव करणार. विरोधी पक्षानं तांडव केलं तर त्याचे दुष्परिणाम जनतेलाच भोगावे लागणार,  असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, हे म्हणणं योग्यच आहे. पण टाळेबंदी करून लोकांना घरी बसायला लावण्याचा सरकारलाही काही छंद नाही. करोनाची दुसरी लाट अधिक भयंकर आहे. करोनाग्रस्तांच्या संख्यावाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. हे काही आपल्याला शोभणारं नाही. लोकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरी यास कारणीभूत आहे. महाराष्ट्रात सध्या फक्त रात्रीचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. हे निर्बंधदेखील पाळायला लोक तयार नसतील तर सरकारला कठोर उपाययोजना कराव्याच लागतील, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.