गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गायरानातील अतिक्रमणे हटवण्याची गडबड करू नका, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील गायरानमधील घरकुलधारकांनी आ. मुश्रीफ यांच्याकडे कैफियत मांडली. त्यांच्या मागण्यांचे निवेदन मुश्रीफ यांनी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना दिले.

आ. मुश्रीफ म्हणाले, आपण ग्रामविकासमंत्री पदावर असताना महाराष्ट्रभर महाआवास योजना प्रभावीपणे राबवली. ज्या बेघरांकडे घर बांधण्यासाठी जागा नाही, अशा बेघरांना गायरानातील ५०० चौरस फूट जागा देण्याच्या सूचना त्या काळात सरकारने प्रशासनाला केल्या आहेत. त्यामुळे असे घरकुलधारक या कारवाईमुळे कुठे जातील? असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ज्यांची जागा घेऊन घरे बांधण्याची कुवत नाही, बहुतांश अशा लोकांनीच गायरानात अतिक्रमण करून घरे बांधलेली आहेत. त्यांना निवारा देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारीच आहे. सरसकट कारवाई केली तर ते बेघरच होतील.

बैठकीला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, गटविकास अधिकारी शरद मगर, तहसीलदार दिनेश पारगे, गडहिंग्लजचे नगरपालिका मुख्याधिकारी विकास खारगे या अधिकाऱ्यांसह प्रा. किसनराव कुराडे, गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, नगरसेवक हारून सय्यद, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले आदी उपस्थित होते.