मुंबई (प्रतिनिधी) : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरात चिंता वाढली आहे. तर खबरदारी  म्हणून राज्यात ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला  आहे. यावर कोरोना रात्री मोकाट फिरतो आणि दिवसा घऱात बसतो का? असा उपरोधिक सवाल टीकाकार  करत आहेत.  या टीकाकारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच त्यांनी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना नाईट कर्फ्यू लावण्यामागचे कारणही सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दोन दिवसांपासून संचारबंदी सुरु आहे. त्यावर अनेकजण टीका करत आहेत. पण जनतेला थोडीशी जाणीव करुन द्यायची गरज असते.  अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे.  दिवसा आपण लॉकडाउन करु शकत नाही. तशी वेळही येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. अनावश्यक गर्दी टाळणे हे जास्त महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.