अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक मास्क न लावता आले होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत होते.  या नागरिकांना  अजित पवारांनी चांगलेच फैलावर घेतले.   

व्यासपीठावरून बोलताना मास्क न लावलेल्या नागरिकांबाबत  अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. हे बघा पठ्ठे विनामास्कचे आले आहेत. फिरत आहेत. आता यांच्यापुढे काय डोक फोडून घ्यायचं का ?, असे म्हणत त्यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना खडे बोल सुनावले. ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून, परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीत पैसे कमी येऊ लागले आहेत. त्यात केंद्र सरकारकडून राज्याच्या वाट्याचे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. पण तरीही राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतील पैशांतून कामे सुरू ठेवली आहेत, असे  पवार यांनी यावेळी सांगितले.