कोल्हापूर (प्रतिनिधी) : वीज बिलाची वसुली करताना थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, अशा सूचना महावितरण कंपनीला द्याव्यात, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या जागतिक महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-व्यवसाय बुडाले, अनेकांची नोकरी गेली. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. आर्थिक अडचणींवर मात करीत, जनजीवन पूर्वपदावर यावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना सरकारने दिलासा देणे गरजेचे आहे. लॉकडाऊच्या काळातील व्यावसायिक, औद्योगिक वीज ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करण्याचे व घरगुती वीज बिल माफ करण्याचे आपल्या महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. मात्र, अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांना दिलासा देण्यासाठी वीज प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. तरी लॉकडाऊन काळातील औद्योगिक वीज ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करणे व घरगुती वीज बिल माफ करण्याबाबतचा निर्णय होईपर्यत थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करु नये, याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणेला देऊन सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.