पुणे (प्रतिनिधी) : ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज (रविवार)  येथे लगावला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना शरद पवार गप्प का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी पलटवार केला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. याच मुद्द्यावरून पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?, असे पाटील म्हणाले होते. त्याला शरद पवारांनी खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे.