अहमदनगर (प्रतिनिधी) : काँग्रेसमध्ये अंतर्गंत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (शनिवार) स्पष्टीकरण दिले आहे. ते संगमनेरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते.

थोरात म्हणाले की, नाना पटोले हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बैठका या सुरू असतात. त्यात मतमतांतरे असतात. याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत. असे काहीही नाही. अहमदनगर जिल्हा हा माझा जिल्हा असल्याने काही जण बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे आहे. तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात. 

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकांदरम्यान काही ठिकाणी पदाधिकारी निवडीचे वाद समोर आले आहेत. त्याचबरोबर ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि पटोले यांच्यामध्ये ही धुसफूस असल्याची चर्चा होऊ लागली आहे.