मुंबई (प्रतिनिधी)  : कोरोना’चा  धुमाकूळ पुन्हा सुरू झाला, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नव्हे, ती आता जाताना दिसत आहे. ‘एम्स’सारख्या सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही,  हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. पुन्हा लॉकडाउन  टाळायचा असेल, तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे. विरोधकांनो,  निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला,  असा टोला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडक मारते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे.  राज्यात ‘लॉकडाउन’ लावायचे की नाही, याचा निर्णय पुढील आठवड्यात घेऊ. ‘मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाउन टाळा’,  असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत,  पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉकडाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले.  राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.  दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील,  देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय? असा सणसणीत टोला भाजपला  लगावला आहे.