शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते. पण यावर्षी कोरोनाचे  सावट असल्याने गर्दी टाळण्यासाठी नृसिंहवाडी येथे (दि. २३, २४) जुलैरोजी भाविकांसाठी प्रवेश बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.

दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अभिषेक, श्रींच्या पादुकांचे दर्शन,  गुरुचे पूजन यासाठी विविध राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात. परंतु, मंदिरे बंद असल्याकारणाने भाविकांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जात येत नाही. पण, प्रशासनाने काहीशी शिथिलता दिली असल्याने गुरुपौर्णिमेवेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे शुक्रवारी आणि शनिवारपर्यंत भाविकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. मंदिर बंदचा आदेश पोलीस प्रशासनाने दिला असल्याचे सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामविकास अधिकारी बी. एन. टोणे यांनी सांगितले.