मुंबई (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पूजाने शेवटची फेसबुक पोस्ट १८ जानेवारीरोजी केली होती. आता ती पोस्ट समोर आली आहे. त्यावरून नव्या विषयाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाणने या पोस्टमध्ये मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे.
पूजाने फेसबुक पोस्टमध्ये नेमाडे यांचा उल्लेख नालायक, मतिमंद आणि एकेरी भाषेत केला आहे. ८ हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा, जहाज बांधणी, इंजिनिअरिंगमध्ये एवढी उन्नत कशी काय ? याचा इतिहासकार शोध घेत आहेत. आणि हा नालायक खान्देशी लेखक भालचंद्र नेमाडे देशी दारू पिऊन त्यावर कादंबरी लिहीत आहे, अशा मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध, असे आक्षेपार्ह शब्द पूजाने पोस्टमध्ये वापरले आहेत.
दरम्यान, भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीला ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कादंबरीत नेमाडेंनी बंजारा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह लिखान केल्याचा काही राजकीय मंडळी आरोप करत आहेत. त्याच्याविरोधात काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले गेले आहे. पूजाची फेसबूक पोस्ट त्याच संदर्भाने असल्याचे बोलले जाते. परंतु एका ख्यातनाम साहित्यिकाबद्द्ल अशी शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून उमटत आहेत.