मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर आता नव्या पदांची नियुक्ती होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरे उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, अशा बातम्यामध्ये काहीही तथ्य नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना समसमान कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यानुसारच आघाडी सरकारचे काम सुरू आहे. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याप्रमाणे होणार आहे, असे स्पष्ट करून अजित पवारांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या. एल्गार परिषदेबाबत सरकार नरमाईची भूमिका अजिबात घेत नाही आहे. त्याच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आपले काम चोखपणे करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.