शिरोळ (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समवेत खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पूरग्रस्त भागातील स्थलांतरित करण्यात आलेल्या जनावरांच्या चाऱ्याची प्रचंड मोठी समस्या तालुक्यामध्ये निर्माण झाली असून शासनाच्यावतीने या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी अजित पवार यांच्याकडे केली. खा. माने यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी त्वरित निर्णय घेऊन शिरोळ तालुक्यातील चार साखर कारखान्यावरती चारा सोपवण्याची जबाबदारी दिली.

तसेच शेतीच्या व घरांच्या झालेल्या नुकसानीची पूरग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई शासनाच्यावतीने देण्यात यावी व पूरग्रस्त भागातील सर्व नागरिकांचे प्राधान्यक्रमाने को-व्हॅक्सिनचे  लसीकरण  पूर्ण करून घ्यावे अशीही मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील  ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखानावर, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात तहसिलदार, अपर्णा मोरे शासनाच्या सर्वच विभागाचे विभागप्रमुख व नागरिक उपस्थित होते.