इचलकरंजी (प्रतिनिधी) : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि तिची अमानुष हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत अत्याचार विरोधी विद्यार्थी समितीच्या वतीने इचलकरंजीत आज (सोमवार) प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

नांदेडमध्ये नुकताच एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडलीय. आहे. या घटनेने समाजातील मुली, महिला आता असुरक्षित असल्याची भावना बळावली आहे. यातील नराधमांना फाशी द्यावी आणि अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाजी पुतळा चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चात मुली, मुलांसह, नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मोर्चास सुरुवात केली. यानंतर हा मोर्चा मलाबादे चौक ,काँग्रेस कमिटी यामार्गे प्रांत कार्यालयावर आणण्यात आला. मोर्चातील काही मुला – मुलांनी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.

यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या मोर्चामध्ये मेघा कुराडे, प्रियंका भालेकर, प्राजक्ता करमाळकर, आनंद खोडे, सद्दामहुसेन कारभारी, प्रविण मडिवाळ यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.