कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूरग्रस्त सभासद शेतकऱ्यांना राजाराम कारखान्याच्या वतीने होत असलेली मदत पाहून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. प्रत्येक ठिकाणी नकारात्मकता शोधणाऱ्या विरोधकांची स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही ही प्रवृत्ती आहे. राजारामच्या शेतकरी हिताच्या योजनांवर टीका म्हणजे सभासद विरोधी भूमिका असल्याचे प्रत्युत्तर पत्रकाद्वारे राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, राजाराम साखर कारखान्यावर टिका करणाऱ्यांचे पालक आणि मालक सध्या सत्तेत असून मंत्री आहेत. परंतु, त्यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केले आहे. महापूर आल्यानंतर पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना कसलीही तातडीची मदत केली नाही. उलट आम्ही मदत करत असताना त्यावर आक्षेप घेऊन स्वतःची कातडी वाचवायचा ते प्रयत्न करत आहेत. २०१९ च्या महापुरावेळी भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना पूरग्रस्तांना तातडीने आवश्यक ती मदत केली होती. तुम्ही सरकार म्हणून काय केले ते सांगावे.

अशा कठीण परिस्थितीत अस्मानी संकटाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आधार देणे गरजेचे होते.  हे लक्षात घेऊन छ. राजाराम महाराजांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करणाऱ्या राजाराम कारखान्याने ऊस रोपे व बियाणे देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावर विरोधकांनी कांगावा सुरू केला. प्रत्येक कारखाना आपल्या सभासदाकारिता कालानुरूप नवनवीन हितकारक निर्णय व धोरण अवलंबत असतो. त्यानुसारच आपल्या कारखान्याने उस पुरवठा न केलेल्या सभासदांना देखील सभासद साखर ३ किलो वरून ५ किलो करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करायला लागणाऱ्या शेतकरी सभासदांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. पण एकंदरीत आमच्या विरोधकांना अशा सभासदांना आम्ही दिलेली ही गोड साखर सुद्धा कडू लागत आहे. या निर्णयाचा आणि निवडणुकीचा संबंध जोडण्याचा निरर्थक प्रयत्न त्यांनी करू नये. इथले सभासद सुज्ञ आहेत, ते अशा आरोपांना बळी पडणार नाहीत.

शिवाय राजाराम कारखान्याने कै. भगवानराव पवार यांच्या नावाने ऊस विकास योजना सुरू केली. यावरही विरोधकांनी टीका केली आहे. ज्या व्यक्तीने कारखाना सहकारी व्हावा म्हणून प्रयत्न केले. त्यांच्या नावाने योजना सुरू केल्याबद्दल सर्वच सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. कै. भगवानराव पवार हे कारखान्याच्या सर्वच सभासदांचे आदराचे व्यक्तीमत्व आहे. ते काही विशिष्ट सभासदांचे मालकीचे नाहीत. त्यामुळे चांगल्याला चांगलं म्हणायची सवय या लोकांनी ठेवायला हवी.

या लोकांनी बाजार समितीचाच बाजार केला. शेवटी तिथे प्रशासक नेमायची वेळ आली आणि आता ही लोकं राजाराम कारखान्यावर टीका करतात म्हणजे लबाडीची हद्दच झाली. त्यांच्या नेत्यांनी सप्तगंगा साखर कारखान्याच्या सभासदांचा विश्वासघात करून कारखान्यावर डी.वाय.पाटील यांच्या नावाची पाटी लावून खाजगीकरणाकडे वाटचाल केली आहे. छ.राजाराम कारखान्यात योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान राखायची परंपरा आहे.

म्हणूनच कै. भगवानराव पवारांचं नाव या योजनेला देण्यात आलेलं आहे. डी.वाय पाटलांच्या ऐवजी सप्तगंगा साखर कारखान्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी खरंच मोलाच योगदान दिलं त्या बाळ पाटलांचे नाव कारखान्याला देण्याची किमान नैतिकता तरी यांनी दाखवावी, असे पत्रकात म्हटले आहे.