मुंबई (प्रकरणी) : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात काहीही तथ्य नसून हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी दिला होता. याविरोधात ईडीने दाखल केलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाने आज (गुरूवार) फेटाळून लावली.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे ‘ईडी’ ला या प्रकरणाचा तपास करता येणार नाही. त्यामुळे ६९ जणांना दिलासा मिळाला आहे. या तपासाअंती कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष नोंदवणारा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर करून प्रकरण बंद करण्याची विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने मूळ तक्रारदार अरोरा यांना या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेना आणि भाजप अशा सर्वच पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.