पुणे (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. भाजप सत्तेत येईल या भीतीने नाराज असलेले पुन्हा एकत्र येण्याचे प्रकार घडले. सरकार संपूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असून, वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले आहेत. कोरोना महामारीतही भ्रष्टाचार केला. आपले वाभाडे निघतील या भितीनेच सरकार अधिवेशन घ्यायला घाबरत आहे. हिंमत असेल तर अधिवेशन घेऊन दाखवा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले. त्यांनी जयंत पाटलांना चंपा म्हणण्यावरुन उत्तर दिले. आम्हीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उठा म्हणू का? अशी विचारणाही केली.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणते आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणते होणार नाही. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे. या सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. शिक्षणातलं आरक्षण यांनी आता रद्द केले, असेही ते म्हणाले.