मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह राज्यात वाढत असणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येवर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःचं अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?, असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये देशपांडे यांनी म्हटले आहे की,  महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, गुजरात कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत कोरोना वाढत नाही. महाराष्ट्रात मात्र वाढतोय. जनतेनं काम करायचीच नाहीत का? कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचं का? तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येताहेत म्हणून कोरोना वाढतोय का आणि एवढे कडक निर्बंध लावणार असाल तर तर जनतेला काही सवलती देणार का?, असा सवालही देशपांडे यांनी केला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्ण संख्या कमी होते, तेव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार, अशी टीका करत देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर याआधी निशाणा साधला होता.