मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातून शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरु आहे; पण शिवसेना जागेवरच असून, बंडखोर वॉकरवर चालत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम शिवसेनेकडून केला जाईल. शिंदे गट गुवाहाटीत कैदी आणि गुलाम बनून राहत असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी मंगळवारी केला. अलिबाग येथे शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.

राऊत म्हणाले, कितीही प्रयत्न करा अटक करुन घेईन; पण गुवाहाटीला जाणार नाही. छप्पन वर्षांपासून शिवसेना उभी आहे. तेव्हापासून २६० सेना आल्या; पण त्यात केवळ दोनच सेना टिकून राहिल्या. त्यात भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना आहे. दिघेंसाठी पन्नास फटके खाल्ले, आता फटके देण्याची वेळ आली. जनसागर उसळला तर काय होईल हे सांगायला नको. ते लपून बसले आहेत. त्यांच्यात हिमंत नाही. पळपुट्यांसाठी केंद्राची सुरक्षा आहे.

राऊत म्हणाले, अब्दुल सत्तार म्हणतात की, हिंदुत्व धोक्यात आले म्हणून गेलो हे जरा आश्चर्यच आहे. गेलेल्या बंडखोरांपैकी २२ आमदार राष्ट्रवादीतून आले आणि तेच पवारांना शिव्या घालीत आहेत. शिवसेनेच्या सत्तेत मंत्रीपद मिळेल म्हणून आमच्यात आले आणि पळून गेले.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांचे वाटोळे झाले हा इतिहास आहे. गद्दारांना क्षमा नाही हे आनंद दिघेंचे वाक्य आहे. इतके वर्षे ते आठवले नाही. माणसे विकत घेताना आनंद दिघे आठवले नाही, आताच का आठवत आहेत. ईडीपासून सुटका करून घ्यायची आहे म्हणून ‘त्यांचे’ असले कारस्थान आहे.