कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी महापालिका प्रशासनाने १८००२३३१९१३ या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा शहरवासीयांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

त्यांनी सांगितले की, तक्रारीसाठी नागरिकांनी महापालिका अथवा महापालिकेच्या अन्य कार्यालयांमध्ये समक्ष जाऊन वेळ व श्रम खर्च न करता घरबसल्याच महापालिकेने जाहीर केलेल्या टोल फ्री क्रमांकावर आपली अडचण अथवा तक्रार दाखल करावी. महापालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्याचे निराकरण केले जाईल. या सुविधेमुळे किरकोळ आणि दैनंदिन स्वरूपाच्या तक्रारींसाठी नागरिकांना महापालिका कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.