कोल्हापूर : महिलांना स्वयंरोजगारातून स्वाभिमानाकडे नेण्यासाठी जयश्री चंद्रकांत जाधव फाऊंडेशन कटिबद्ध आहे असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन योग्य व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आमदार जाधव यांनी  व्यक्त केला.

नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी कैलासगडची स्वारी मंदिरात फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांच्या आई प्रेमला पंडितराव जाधव, उद्योजक सत्यजित जाधव, डॉ. दश्मीता जाधव प्रमुख उपस्थित होत्या. प्रारंभी चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कुंकुमार्चन सोहळ्याने फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले.

आमदार जाधव म्हणाल्या, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध उपक्रम राबवून महिला सशक्तीकरणावर भर देत आहे. समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे, सक्षम करण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून होणार आहे.

वर्षभर विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांचा निखळ मनोरंजनासाठी आणि प्रत्येक महिलेला मनमुराद जगण्याचा आनंद देण्यासाठी जयश्री जाधव फाऊंडेशनची स्थापना केली असून, शहरातील सर्व महिलांनी फाऊंडेशनचे सभासद व्हावे, असे आवाहन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मीता जाधव यांनी केले.

नवरात्रात नऊ दिवस शहरातील विविध भागात फाऊंडेशनच्या माध्यमातून कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना सर्व साहित्य फाऊंडेशनतर्फे देण्यात येणार आहे, तरी कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्योजक सत्यजित जाधव यांनी केले. यावेळी सुनंदा जाधव, योगेश्वरी महाडिक, शारदा देवणे, श्वेता देवणे, मालिनी पोवार, सुनीता पाटील, विना परमार, सेजल सलगर, सरिता पवार आदी महिला उपस्थित होत्या.