मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाने मृत होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडिसीवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. अशी विदारक परिस्थिती असताना आता कोरोनाची दुसरी लाट कधी कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलासादायक माहिती दिलीय. कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरेल. १५ ते २५ मे च्या सुमारास ही लाट कमी होताना दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. लहाने यांनी सांगितले की, लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा दर सध्या स्थिर आहे. काल राज्यात ५६ हजार संख्या होती. ही संख्या अशीच स्थिर राहिली किंवा खाली येऊ लागली तर आलेख खाली येतोय असं म्हणावे लागेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस १६ फेब्रुवारी रोजी अमरावती सुरुवात झाली. जगातील इतर देशांच्या अभ्यासानुसार कोरोना ९० दिवसांनी कमी होत असतो. त्यामुळे १५ मे ते २५ मे च्या दरम्यान कमी होताना दिसेल.  नागपुरात ५ स्ट्रेन आढळले आहेत.

विषाणू दोन प्रकारे पाहिला पाहिजे. आपल्या देशात ५ नव्हे तर १ हजार स्ट्रेन आढळले आहेत. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की हा स्ट्रेन जास्त संसर्ग वाढवणारा आहे का? तो शरीरावर जास्त परिणाम करणारा आहे का ? असे स्ट्रेन प्रत्येक ३ महिन्यांनी मिळत असतात. त्यामुळे या नव्या स्ट्रेनचा अभ्यास आम्ही करत आहोत. पहिल्या लाटेत ५० वयाच्या वरील लोक बाधित झाले. दुसर्‍या लाटेत २० वर्षांवरील तरुण बाधित झाले. आता १८ वर्षापर्यंत लसीकरण होणार आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. उर्वरित १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसर्‍या लाटेत बाधित होतील असा अंदाज आहे.