नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात मागील काही महिन्यांपासून दररोज लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासांतील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची नीचांकी नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली असली, तरी प्रत्यक्षात ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या एकूण ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही बऱ्याच अंशी समाधानाची बाब असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णसंख्येबरोबरच मागील २४ तासांत मृतांची संख्याही घटली आहे. देशात कोरोना विषाणूनं जनजीवन वेठीस धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं केंद्र सरकारकडून लॉकडाउनची कडक अमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउन शिथिल केला जात असतानाच्या काळात रुग्णसंख्येनं मोठी उसळी घेतली होती. मात्र, आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात देशात ५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.