मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहे. या नेत्यांना बडवे आणि कारकून चाणक्य असे म्हणत संजय शिरसाट यांनी गेल्या अडीच वर्षांपासून घडत असलेला प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.

बुधवारी रात्री वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती, असे शिरसाट यांनी पत्रात म्हटले आहे.

हेच सो कॉल्ड (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम यांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा, पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभे ठेवले जायचे. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे, असे शिरसाट यांनी पत्रातून विचारले आहे.

हिंदुत्व, अयोध्या, राम मंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले? तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे यांना फोन करून सांगितले की, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतःपरत घेऊन या.

जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातील कामे करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भूमिपूजन आणि उद्घाटने करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातील लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना, मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? असे प्रश्न शिरसाट यांनी पत्रात उपस्थित केले आहेत.

विरोधकांची कामे व्हायची, पण मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नव्हते. आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचे या विचाराने जीव कासावीस व्हायचा. या सर्व कठीण प्रसंगात बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे यांच्यासोबत असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले आहे.