कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशात तयार झाली आहे. ही स्वदेशी लस सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ते आज (मंगळवार) आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा शुभारंभप्रसंगी बोलत होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, आत्मनिर्भर भारत आणि कोरोना लसीकरणासंबंधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात १६ व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करुन तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्यावतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या वेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे उपस्थित होते.