कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी या तालुक्यांसमवेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील प्रांतधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, न. प. चे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेतली, या वेळी ते बोलत होते.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रशासनाकडून कोरोना अटकावासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असूनही केवळ सूक्ष्म नियोजनाअभावी रुग्ण संख्या वाढते आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले की, जिल्ह्यात आपण प्रतिदिनी सुमारे १० हजारांच्या आसपास टेस्टींग करतो, संबंधितांनी हे प्रमाण दुप्पट करावे  म्हणजेच दिवसाला किमान २० हजार टेस्टींग करण्यात याव्यात. जिल्ह्याचा ‘शून्य पॉझिटिव्हिटी रेट’ आणण्यासाठी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, तहसिलदार, बी. डी. ओ., न. पा. मुख्याधिकारी यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे.

तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) मनिषा देसाई यांनी संपूर्ण तालुक्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आढावा सादर केला. या आढावा बैठकीसाठी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, उपजिल्हाधिकारी सर्वश्री हेमंत निकम, भगवान कांबळे, कॅफो (जि. प.) राहुल कदम, डॉ. हर्षदा वेदक उपस्थित होते.