मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटींहून अधिक मास्कचे उत्पादन करुन कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला अशा सर्व माता – भगिनींनी या काळात शौर्य गाजविले. या माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. तुम्ही गरुडभरारी घ्या, तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम आमचे सरकार करेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) राज्यातील सुमारे १ लाख महिलांशी संवाद साधला.

ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये आजच्या जागतिक महिला दिनापासून ८ मार्च ते जागतिक पर्यावरण दिन ५ जूनपर्यंत ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर, मुख्य सचिव, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  तर वेबलिंकद्वारे बचतगटांच्या सुमारे १ लाख महिला सहभागी झाल्या होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात उत्पादीत होणारी विशेष उत्पादने लक्षात घेऊन बचतगटांनी त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करावे. या उत्पादनांना आपण राज्य, देश आणि जागतिक पातळीवर मार्केट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानातून पुढील ३ महिने ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबविण्यात येतील. ‘शेत दोघांचे, घर दोघांचे’ उपक्रमातून मालमत्तेवर महिलेचेही नाव असावे याला चालना देण्यात येईल. महिलांमधील तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती यासाठी जनजागृती केला जाईल.

यावेळी महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाची मार्गदर्शक पुस्तिका, घडीपत्रिका, कॉपशॉपचा लोगो तसेच घरकुल मार्टच्या लोगोचे मुख्यमंत्री ठाकरे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.