पंढरपूर प्रतिनिधी-

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील १ लाख ५२ हजार ७२७ नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे ३५३ टन गहू व ५१६ टन तांदूळ असे एकत्रित ८६९ टन धान्य वाटप करावे लागणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यात ग्रामीणमध्ये ११६ तर शहरात ३० असे एकूण १४६ रेशन दुकान आहेत. अंत्योदय योजनेत ५ हजार ७१३ कार्डधारक असून २१ हजार ५०६ लोकसंख्या आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत ३२ हजार ७०१ कार्डधारक असून १ लाख ३१ हजार २२१ लोकसंख्या आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास प्रतीकार्ड १५ किलो गहू २ रुपये किलो दराने व २० किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने अंत्योदय कार्डधारकास दिले जात होते. तसेच अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती २ किलो गहू २ रुपये दराने व ३ किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी २०२३ पासून अंत्योद्य योजनेतील प्रत्येक कार्डधारकाला १५ किलो गहू २० किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती २ किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे.

तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांकडून या योजनेतील नागरिकांना योग्य पध्दतीने वाटप केले जाणार आहे. या योजनेतील कार्डधारकांनी पैसे देऊ नयेत तसेच कोणी पैशाची मागणी केल्यास तात्काळ अन्नधान्य पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असे, आवाहनही तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.