मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (सोमवार) २०२१-२२ साठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बजेट देशासाठी पाहिजे होते, निवडणुकांसाठी नव्हे, अशी मार्मिक टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, त्याचबरोबर अधिक माहिती घेऊनच यावर सविस्तर भाष्य करेन, असे सांगत त्यांनी अर्थसंकल्पावर अधिक बोलणे टाळले.

यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत असा आरोप देशातील सर्वच विरोधी पक्षांनी केला आहे. महाराष्ट्रासाठी नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी तरतूद वगळता कोणतीही भरीव तरतूद नसल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे खासदार संजय राऊत यांनीही या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर खरपूस टीका केली आहे.