कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खानापूर (ता.भुदरगड) ग्रामपंचायतीतील शिवसेनेच्या विजयाबद्दल आमदार प्रकाश आबिटकर यांची फेसबुकव्दारे अभिनंदन करून कौतुक केले आहे. खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र लढले असूनही शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी एकटं लढून चंद्रकांत पाटलांना चारली धूळ, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आ. आबिटकरांचे अभिनंदन केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेची ठरलेली भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून आणत सत्तांतर घडवून आणले. आबिटकर गटाचे ६ सदस्य निवडून आले. तर भाजपचे ३ सदस्य निवडून आले आहेत. या निकालामुळे चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. पाटील यांच्या गावातच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आघाडी झाली होती. परंतु शिवसेनेने या आघाडीला पराभवाची धूळ चारली.

दरम्यान, शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खानापुरातील मतदारांनी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवत इतिहास रचला आहे. येथे विकासकामांच्या जोरावर विजय मिळवला आहे, असे सांगत ‘गाव करेल ते राव करेल काय’ ? असा सवाल करत आमदार प्रकाश आबिटकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.