सातारा (प्रतिनिधी) : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण पेटले आहे. शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडाडून विरोध करताहेत. असे असताना साताऱ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यामुळे सातारा शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सातारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे आज (शनिवार) सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने हा फलक काढून ताब्यात घेतला. उदयनराजे समर्थक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

येथील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. दरम्यान, आज (९ जानेवारी) सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे लिहिलेला नाम फलक अज्ञाताने फाडल्याचे निदर्शनास आले. शहरात याची माहिती समजताच पोवईनाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक जमा होऊ लागले. त्यानंतर ॲड. दत्तात्रेय बनकर, संग्राम बर्गे, सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी केवळ संभाजी महाराजांविषयीच असे का घडते या घटनेमागे कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा संतप्त पवित्रा घेतला. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले.