कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण १ व ग्रामीण २ या विभागातील शेती वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शेतीला पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर महावितरणकडून शेती वीजपुरवठ्याचे वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण १ विभागात पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, करवीर तर कोल्हापूर ग्रामीण २ विभागात राधानगरी, कागल, भुदरगड या तालुक्यांचा समावेश होतो. महावितरणकडून या भागातील शेतीच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. मात्र रात्रीच्या वेळी नागरीवस्तीसाह शेतभागात वन्यप्राण्यांच्या वावर वाढल्याने शेतीच्या वेळापत्रकात बदल व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री ना सतेज पाटील यांचेकडे केली होती. ही मागणी महावितरण मुख्यालयाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.

कोल्हापूर ग्रामीण १ विभागात रात्री १.१५ ते सकाळी ९.१५ वाजेपर्यंत ऐवजी आता रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत या वेळेत शेती वाहिनीवर वीजपुरवठा केला जाईल. कोल्हापूर ग्रामीण २ विभागात रात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत ऐवजी आता रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत तर दिवसाचे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत ऐवजी सकाळी ८.४० ते ४.४० वाजेपर्यंत या वेळेत शेती वाहिनीवर वीजपुरवठा केला जाणार आहे.