कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल पाटील यांनी समाजमाध्यमातून सरकारचे आभार मानले आहे.

मी आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडे अशी मागणी करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा, सुव्यस्था ठिक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. पक्षाचे कार्यकर्तेच आमचे सुरक्षा कवच आहेत, असेही त्यांनी फेसबुकवरील एका पोष्टमध्ये म्हटले आहे. याउलट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुरक्षा कपातीवरून सरकारवर टीका केली आहे. फडणवीस आणि पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे सुडाचे राजकारण आहे, असा आरोप उपाध्ये यांनी व्टिट करून केले आहे. चंद्रकांत पाटील आणि उपाध्ये यांनी सुरक्षा कपातीवर भिन्न मते व्यक्त केली आहे. परिणामी यावर भाजपची नेमकी भूमिका काय, असा संभ्रम सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.