मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या पोपटाला आम्ही तुरुंगात टाकलं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावरून अर्णव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही नव्हे, पोपट वगैरे तेच पाळतात’,  असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. ते आज (बुधवार) मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, एका मोठ्या टीव्ही चॅनलच्या संपादकाला तुम्ही फरपटत नेता. तो विनंती करतो, माझ्या आईला औषधे देऊ द्या, मग निघू या. पण ते ऐकले जात नाही. या गोष्टीचे आम्ही समर्थन करणार नाही. अर्णव गोस्वामी यांनी विरोधात बोलल्यामुळे राज्य सरकार त्यांना अडकविण्याची कुठलीतरी संधी शोधत होते. त्यातूनच ही कारवाई झाली. या प्रकरणासाठी आंदोलन, निषेध व्यक्त करणार आहे. पत्रकार, महिला किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असू द्या, त्यांच्याविरुद्धच्या अन्यायाविरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही. नाईक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांना आज ज्याप्रकारे अटक झाली आहे ते निषेधार्ह आहे.