कराड (प्रतिनिधी) : राज्य सरकार अस्थिर असल्यामुळे सर्वच पक्षातील लोकांचा कानोसा घेतल्यास त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असे सूतोवाच खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. कराडमध्ये त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

‘ईडी’च्या ९५ टक्के कारवाया या विरोधकांवर झाल्याचा आरोप करून खासदार सुळे म्हणाल्या, की ‘आज लहान मुलेही ‘ईडी’बाबत गंमतीने बोलतात. ५० खोक्यांचीही सर्वत्र चर्चा होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. यामुळे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचे नाव कमी होत असून, फार मोठी कुचेष्टा होत आहे. त्यामुळे आम्हाला अस्वस्थ वाटते, वेदना होतात.’ माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या महाराष्ट्रातील राजकारण अशोभनीय बनले आहे. कुणी बंदूक काढतोय, कुणी एक थप्पड मारली तर चार थप्पड मारा म्हणतोय, कुणी तुम्हालाही ५० खोकी पाहिजे का म्हणतोय.. ही विधाने ही आपल्या पुरोगामी विचारांच्या राज्याला शोभणारी नाहीत,अशी खंतही खासदार सुळे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे राजकारण ज्या दिशेने आणि पद्धतीने चालू आहे ते निश्चित दुर्दैवी असून, या साऱ्यावर आपला विश्वासच बसत नसल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६-७ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद असल्याबाबत विचारले असता, एका पालकमंत्र्याला कामाचा खूपच ताण असतो असे मत व्यक्त करून त्यांनी फडणवीसांकडे अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असणे चुकीचे आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत लोकांमध्ये एकच चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि महिन्याभरातच पक्षाचे चिन्ह सर्वत्र पोहोचले आणि आपला पक्ष सत्तेतही आल्याचे त्या म्हणाल्या. स्थानिक निवडणुकांत केवळ दहा दिवसांत उमेदवारांचे चिन्ह घराघरात पोहोचवले जाते. हेही सुळे यांनी निदर्शनास आणले. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.