नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही करत नाही, हे अत्यंत वाईट आहे, असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.
मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने काँग्रेसने देशभरातील प्रमुख शहरात पत्रकार परिषदा घेऊन केंद्र सरकारची पोलखोल केली. टिळकभवन येथे पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, देशाचा कारभार संविधानानुसार चालतो की नाही अशी चिंता वाढत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत आहे ही आणखी एक चिंतेची बाब आहे.
पी. चिदंबरम म्हणाले की, राज्य सरकारांच्या कार्यकारी अधिकारांमध्ये कपात करण्यात आली आहे. बिगर भाजपशासित राज्यांचे राज्यपाल व्हाईसरॉयसारखे वागत आहेत. संसदीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. खोट्या केसेस, तपासाच्या धमक्या देऊन राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. लोकशाहीचे स्वतंत्र आधारस्तंभ असलेल्या संस्था केंद्र सरकारने कमकुवत केल्या आहेत. मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचा हा वटवृक्ष पोकळ झाला आहे.
पी. चिदंबरम म्हणाले की, संरक्षण व परराष्ट्र धोरणांवरही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पाकिस्तान, चीन, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी देशांशी आपले संबंध चांगले राहिले नाहीत. चिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील भूभागात अतिक्रमण केले आहे आणि आजही ते व्यापलेले आहे, याचे भरपूर पुरावे आहेत. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकींपासून भारतीय गस्त घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अर्थव्यवस्थेचा वेग अत्यंत कमी आहे. प्रचंड बेरोजगारी, सततची महागाई, वाढती असमानता हा ज्वलंत विषय आहे. बेरोजगारीचा दर सध्या 7.45 टक्के आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा सामान्य जनतेच्या गरजेच्या नव्हत्या.