टोप (प्रतिनिधी) : कोरोनामुळे दोन वर्षे कोणतेही सण उत्साहात साजरे झाले नाही. यंदा सर्वच उत्सव, सणावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पारंपरिक पध्दतीनेच पण नियम व शिस्त पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शिरोलीचे पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी केले आहे.
टोप येथे झालेल्या गणेशोत्सव बैठकीत बोलताना ते म्हणाले, ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण कायद्याचे पालन केले नाही तर संबंधित मंडळावर कारवाई करण्यात येईल. तसेच गणेश मंडपात कोणतेही अपघात होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी. आक्षेपार्ह देखावा तसेच इतर काही आढळल्यास कारवाई केली जाईल. उत्सवानंतर निर्माल्य पाण्यात न टाकता त्याचे खत करावे, ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवा व एक चांगला संदेश द्यावा, असेही सागर पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच विश्वास कुरणे, मानसिंग गायकवाड, बाळासो कोळी, अशोक पाटील, पोलिस पाटील महादेव सुतार, राजू कोळी, पोलिस नीलेश कांबळे यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.