मुंबई (प्रतिनिधी) : पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना राज्य सरकारने ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी अत्यंत कमी म्हणजे ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आज (बुधवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरामुळे अनेक दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ना-नफा तत्वावर भांडवल उभारणी खर्चापेक्षा (कॉस्ट ऑफ फंड) थोड्या अधिक व्याजदराने बाधित दुकानदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पूर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि पंचनामा झालेल्या पात्र दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना केवळ ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या हजारो बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना होणार आहे.

या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा बँकांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.