कोल्हापूर (प्रतिनिधी) : मायक्रो फायनान्सच्या नावाखाली वसूलीसाठी सर्व सामान्यांवर दबाव टाकून नागरिकांना हिन वागणूक देणाऱ्या वसुली यंत्रणेवर आळा घालावा. यासह मायक्रोफायन्सच्या संदर्भात अन्य मागण्या भाजपच्या वतीने करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुखांचे शिष्टमंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स म्हणजेच सूक्ष्म अर्थकारणाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेला मोठा प्रयत्न होय. या माध्यमातून फेरीवाले, महिला बचत गट,  छोटे व्यापारी, शेतकरी इत्यादींना १० हजार रुपयांपासून ५० हजारांपर्यंत कर्ज देण्यात येते. हे कर्ज स्वीकारत असताना लोकांच्या कडून विविध कर्ज रोख्यांवर सह्या घेतल्या जातात. सर्व सामान्यांची निकड व गरज पाहून या लोकांना भरमसाठ व्याजाला बळी पाडले जाते.  मायक्रो फायनान्सच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम या फायनान्सच्या कर्मचा-यांकडून चालू आहे.

यावेळी भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या राजरोसपणे आपली दुकाने थाटून बसले आहेत. यामध्ये विविध क्षेत्रातील कर्जदारांना शोधण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कामास ठेवण्यात आली आहे. गोड बोलून व विविध भूलथापा सांगून अशा गरजू कर्जदारांना या दुकानांपर्यत आणण्यात येते त्यानंतर त्यांच्याकडून विविध कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या जातात व त्यांना कर्ज वितरीत करण्यात येते. त्यानंतर या कर्ज दारांकडून एखादा हप्ता देखील तटला तर त्याच्या वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची एजन्सी नेमून त्यातून कायद्याला धाब्यावर बसून कर्जदात्याकडून सक्त वसुली केली जाते.

जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले की, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरु असणारी वसुलीची पद्धत जाचक असून पैसे गोळा करण्यासाठी ते आता एखाद्याच्या घरात जाणे, आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे तसेच घरातील किमती वस्तू उचलून नेण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. जिल्ह्यामध्ये कार्यरत असणा-या मायक्रो फायनान्स कंपन्यांची योग्य ती माहिती घेऊन वसुलीसाठी येणाऱ्या अनधिकृत एजन्सी तातडीने बंद करण्याच्या सुचना द्याव्यात.

तर फसवणूक झालेल्या किंवा तक्रारदारांनी स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे संपर्क साधावा. मायक्रो फायनान्स तक्रारीबाबत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख बलकवडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, अमोल पालोजी, जिल्हा चिटणीस सुनिलसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.