मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीची माकडं कालपासून उड्या मारत आहेत. त्यांना माहिती आहे, ईडीचे कार्यालय भाजपच्या कार्यालयात थाटले आहे का ? असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीने समन्स बजवल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. या प्रकारावरून राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

ते म्हणाले, बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. गेल्या एक वर्षापासून महत्त्वाचे लोक भाजपचे काही आणि त्यांचे हस्तक हे सातत्याने मला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते मला धमकावत आहेत. आम्हाला अटक केली तरी ठाकरे सरकार पडणार नाही. भाजपला रोखण्याऱ्या नेत्यांना त्रास देण्यासाठी कागदाचे तुकडे पाठवले जातात. आम्ही कोणत्याही नोटिशीला घाबरत नाही, नोटीसला उत्तर दिले जाईल. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर केला जात आहे.