मुंबई (प्रतिनिधी) : परळीतील पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. तसेच या प्रकरणी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या दोघांना अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येऊ लागल्याची माहिती समोर आली आहे.   

आ. भातखळकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. अशा धमक्यांनी बंधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे या प्रकरणी नाव पुढे आले आहे. या मंत्र्याचे आणि आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियात चर्चेत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.