मुंबई (प्रतिनिधी) : राम मंदिर बांधण्यासाठी देशभरात भाजपकडून निधी संकलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. रामाच्या नावान काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण पैसै मागण्यासाठी. आपल्याला तसे करायचे नाही. राज्यातील तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली.

मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे बडे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. बाबरी मस्जिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. पण आता भाजप पैसे मागण्यासाठी रस्त्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. राम मंदिराच्या निधी संकलनाच्या भाजपच्या कार्यक्रमाबाबत बोलताना ‘देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ठाकरे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असे वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केले होते. नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असे म्हणतात. हिम्मत असेल तर पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करुन दाखवा. मग आम्ही तुमचे स्वागत करु, असे ते म्हणाले.