मुंबई (प्रतिनिधी) : ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील सूत्रसंचालनामुळे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी तक्रार दाखल केली आहे.

अभिमन्यू पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणार्‍या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली आहे.

३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात २५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?” असा प्रश्न विचारला. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसंच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही, असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.