मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीसाठीच्या पायी पंढरपूर वारीला राज्य सरकारनं परवानगी नाकारली आहे. अर्थात, बऱ्याच वारकऱ्यांनी या निर्णयाला विरोध आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनेही याला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याही पुढे जाऊन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. वारकऱ्यांनी आपला संताप योग्य पद्धतीने व्यक्त केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच आषाढी एकादशीला अभिषेक करावा, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.

भातखळकर यांच्या टीकेला खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ आहे. ‘शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत’ अशा आशयाचं विधान राऊत यांनी मागील वर्षी ठाण्यातील एका कार्यक्रमात केलं होतं. त्या वेळी वाचाळवीर राऊत यांनी विठ्ठलनामाचं पावित्र्य घालवल्याची टीका भाजपनं केली होती. आता राज्य सरकारनं पायी वारीवर बंदी घातल्यानंतर भाजपनं पुन्हा टीकेची झोड उठवली आहे.

‘सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारनं आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,’ असं ट्वीट भातखळकर यांनी केलंय.