मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर त्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच फासे पलटतील, असे सूचक विधान केले आहे. फडणवीस यांच्या या विधानावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना याबाबत मनापासून शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल पटोले यांचे अभिनंदन केले आहे. तर सामनाच्या अग्रलेखातून नानांवर टीका नाही, तर कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाला संजीवनी देण्याचा काँग्रेसचा उत्साह महत्त्वाचा आहे, काँग्रेस हा देशात महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे. सत्तेत नसला तरी या पक्षाला परंपरा आणि इतिहास आहे. राज्यातच नव्हे, तर देशात काँग्रेसला संजीवनी मिळावी, ही आमची इच्छा आहे. पक्षात परिवर्तन करावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले.