मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाउनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्यास आता कारवाई  होणार आहे.  सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे  लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हॉट्सअपसह सोशल मीडियातून लॉकडाउन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्याचा जात आहेत.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत  आहे. त्याचबरोबर अनेक गैरसमजही पसरत आहे. याची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेत  सक्त ताकीद दिली आहे.

लॉकडाऊनबाबत खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.