कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील बाजार भोगाव, अणुस्कुरा या मार्गावर असणाऱ्या कुंभारवाडा चौक ते पुनाळफाटा चौक येथे गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने संपुर्ण रस्त्यालाच गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गी लावावा. अन्यथा राज्यमार्ग बंद करण्याचा इशारा कळे ग्रामस्थांसह प्रवाश्यांनी दिला आहे.
बाजार भोगाव, अणुस्कुरा या मार्गावर कळे ही पश्चिम पन्हाळ्यातील मोठी बाजातपेठ वसली आहे. हा रस्ता प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. सांडपाण्याचा गटारीतून योग्यप्रकारे निचरा न झाल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी या राज्यमार्गावर जवळपास १ फुटाच्या दरम्यान पाणी येते. गटारीतील तुंबलेले पाणी रस्त्यावर आल्याने सहन न होण्याइतपत दुर्गंधी पसरते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनासुध्दा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पुनाळ फाट्या शेजारील काही नागरिकांनी गटारीचे पाणी घरात किंवा दुकानातच जाते म्हणून मुरुम टाकून अडवले आहे. या रस्त्यालाच गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गेले कित्येक दिवस हे दुर्गंधीयुक्त गाटारीचे सांडपाणी रस्त्यावरच साठून राहिल्याने या परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे. कळे-गगनबाबडा रोडपासून पुनाळफाट्यापर्यंत नवीन मुख्य बाजारपेठ वसली आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी बाजारपेठेतील या सर्व रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त होते. दुर्गंधीयुक्त गटारातील सांडपाण्यामुळे दुकानदारांसह ग्राहक अक्षरशः बेजार झाले आहेत.
या सांडपाण्याचा प्रश्न बाह्यमार्ग मोकळे करुन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा असे कळे ग्रामपंचायतने विशेष प्रकल्प बांधकाम उपविभाग, गगनबावडा उपअभियंता यांना पत्राने कळविले आहे.