इचलकरंजी (प्रतिनिधी) : व्हॅलेंटाईन डे सारख्या डें ना आजवर अनेक तरुण बळी पडलेले आहेत. काहीजण भारतीय संस्कृतीविरोधी कृत्याला खतपाणी घालत आहेत. अशा असभ्य उपक्रमाला आमचा विरोध असून इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

व्हॅलेंटाईन डे मध्ये एकतर्फी प्रेमाचे व जबरदस्तीचे प्रकार आढळून येतात. अनेक मुली व महिला आकर्षणापोटी जाळ्यात सापडून शिकार होत असल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, दरवर्षी शेकडो मुली, महिला मिसिंग होत आहेत. तर अनेक कुटुंब बरबाद होत आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला शासकीय पातळीवर बंधने आवश्यक आहेत. कॉपी शॉप हा प्रकार शहरात नव्याने आला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत येथील प्रकार उघडकीस आले आहेत. याचे मूळ हे व्हॅलेंटाईन डे मध्येच आहे. त्यामुळे कॉपी शॉपला त्वरित आळा घालावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, प्रवीण सामंत, बाळासाहेब ओझा, रणजित पवार, दत्ता पाटील, संतोष मुरदंडे, जितेंद्र मस्कर, सागर कोले, श्रीनिवास आवळेकर, मुकेश दायमा आदी उपस्थित होते.